प्रश्नांच्या सोडवणूकीकरीता महाराष्ट्राला शंकरराव गडाखांच्या रूपाने नेवासा तालुक्याची ताकद दाखवून दया- यशवंतराव गडाख
नेवासा(प्रतिनिधी)क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून शंकरराव गडाख यांनी सोमवारी शक्तीप्रदर्शन करत नेवासा तहसील कचेरीवर जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.प्रश्नांच्या सोडवणूकीकरीता महाराष्ट्राला शंकरराव गडाखांच्या रूपाने नेवासा तालुक्याची ताकद दाखवून दयावी असे आवाहन जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी या अगोदर नेवासा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात झालेल्याकार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी बोलतांना केले.
यावेळी राधाकृष्ण मंगल कार्यालयात झालेल्या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी जेष्ठ नेते यशवंतराव गडाख हे अध्यक्षस्थानी होते तर जेष्ठ नेते विश्वासमामा गडाख ,माजी आमदार शंकरराव गडाख, प्रशांतभाऊ गडाख,जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख, तुकाराम शेंडे,जबाजी फाटके,भाऊसाहेब मोटे,भैय्यासाहेब देशमुख, तुकाराम नवले,प्राचार्य आगळे सर,डॉ.अशोकराव शिंदे,मच्छिंद्र हापसे,नानासाहेब रेपाळे,कारभारी जावळे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील,अतुल महाराज आदमने, रोहिदास लंघे, रामभाऊ केंदळे, व्यापारी अशोकलाल गुगळे,अशोक तांबे सर,ज्ञानदेव आरगडे,अनिल मते, नगरसेवक लक्ष्मणराव जगताप व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी जावळे यांनी प्रास्ताविक करून सद्याची नेवासा तालुक्याची सुरू असलेली दैना व विद्यमान प्रतिनिधीनी लोकांची केलेली दिशाभूल,गडाख यांच्यावर होत असलेले खालच्या पातळीवरील आरोप या विषयी सविस्तर मार्गदर्शन करून एकच निर्धार ..शंकरराव गडाख ... आमदार... हा नारा दिला.शंकरराव गडाख आगे बढो..हम तुम्हारे साथ है..अशा घोषणा दिल्या त्याला उपस्थित युवकांनी दाद दिली.
यावेळी विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे चुलत बंधू संभाजी मुरकुटे यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश केला शंकरराव गडाख यांनी त्यांचा सत्कार करून आलिंगन देऊन त्यांचे स्वागत केले तर असंख्य युवकांनी यावेळी क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश केला.
यावेळी बोलताना माजी आमदार शंकरराव गडाख म्हणाले की नेवासा तालुक्याच्या विकासासाठी मी या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय जुगार खेळत आहे गेल्या पाच वर्षात नेवासा तालुक्याचा विकास झाला नाही त्यामुळे शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य गोरगरीब माणसाचे प्रचंड नुकसान झाले त्यास सद्याचे लोकप्रतिनिधीच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी आमदार मुरकुटे यांचे नाव न घेता केला.धरणात पाणी असताना देखील नेवासा तालुक्यातील ८० गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करावा लागला हे दुर्दैव होते असे सांगून लोकप्रतिनिधीने काढलेल्या विकास रॅलीत वाळूवाले व ठेकेदारांचा सहभाग होता अशी टीका त्यांनी यावेळी बोलतांना केली.
जेष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले की कोणत्याही पक्षाचा आधार न घेता नेवासा तालुक्याच्या विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन शंकरराव गडाख हे क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून उभे रहात आहे हे धाडस त्यांनी दाखवले असून कोणीही त्यांच्या प्रचारासाठी येथे येणार नाही मात्र.. शंकरराव..डरो मत मै हू ना..अशी भावनिक साद घालत त्यांनी शंकरराव गडाख यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न यावेळी बोलतांना केला.
तसेच नेवासा तालुक्याचा विकास विचार व संघटनेच्या ताकदीच्या जोरावर या निवडणुकीत विजय ओढून आणू मात्र भिस्त कार्यकर्त्यांवरती असल्याने सर्वांनी आपली ताकद पणाला लावून तुम्ही आमची दिवाळी चांगली करा असे आवाहन यशवंतराव गडाख यांनी यावेळी केले.
यावेळी झालेल्या मेळाव्यात बहिरवाडी येथील हभप रामनाथ महाराज पवार,शरदराव आरगडे,संभाजी मुरकुटे, सुहास गोंटे,अनिल मते,यांनी मनोगत व्यक्त केले.जेष्ठ विधी तज्ञ अँड.के.एच. वाखुरे व सुभाष राख यांनी मेळाव्याचे सूत्रसंचालन केले.तर युवा नेते प्रशांतभाऊ गडाख यांनी कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद गटवाईज मताधिक्य वाढवा तनमनएकाग्र करून स्व:तच्या ताकदीने काम करा असे आवाहन करून उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार मानले.
मेळाव्यानंतर वाजत गाजत मंगल कार्यालयाच्या प्रांगणातून शक्ती प्रदर्शन करत मुख्य रस्त्यावरून घोषणा देत शंकरराव गडाख हे सर्व कार्यकर्त्यांसह नेवासा तहसील कचेरीवर गेले व अर्ज दाखल केला.यावेळी नागरिक व सर्व कार्यकर्ते हे स्वयंस्फूर्तीने शक्तिप्रदर्शनात सहभागी झाले होते.झालेल्या शक्तिप्रदर्शनाने रस्ते गर्दीने फुलून गेले होते त्यामुळे नेवासकर ही आकर्षित झाले होते.

Post a Comment