नेवासा, प्रतिनिधी
तोफांच्या सलामी देत नेवासा तालुक्यातील प्रवरानदीतीरावर असलेल्या श्री क्षेत्र बहिरवाडी येथे मंगळवारी दि.१९ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजता श्रीकालभैरवनाथांचा जन्मोत्सव उत्साहपूर्ण वातावरण साजरा करण्यात आला.
दिवसेंदिवस बहिरवाडी या क्षेत्राचा महिमा वाढत असून गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी लक्ष घातल्याने सुमारे सव्वा कोटी रुपये खर्चाचे प्रवरा नदीच्या मध्य धारेवर बांधलेले मंदिर भाविकांचे आकर्षण ठरत आहे.पौष महिन्यात देखील पाच ही रविवारी येथे यात्रा भरते श्री कालभैरव नाथांच्या जन्मोत्सवानिमित्त येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
श्री कालभैरवनाथांच्या जन्मोत्सवानिमित्ताने दि.१९ नोव्हेंबर मंगळवारी रात्री १० ते १२ या वेळेत सावखेडा येथील हभप नारायण महाराज यांचे श्री कालभैरवनाथ अवतारावर कीर्तन झाले.किर्तनानंतर रात्री १२ वाजता पुष्पांनी सजविण्यात आलेल्या पाळण्यामध्ये श्री कालभैरवनाथांची मूर्ती ठेवण्यात आली होती.उपस्थित संत महंतांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली उपस्थित महिला भाविकांनी श्री काल भैरवनाथांच्या जन्माचा पाळणा म्हटला पुष्पवृष्टी करून श्री काल भैरवनाथांचा जन्मोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
यावेळी जन्म सोहळया प्रसंगी श्री कालभैरवनाथ मंदिर प्रांगणात तोफांची सलामी देत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.उपस्थित भाविकांना रात्री १२ नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.जन्मोत्सवा निमित्ताने मंदिर व परिसरात भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती.प्रवरामाईच्या साक्षीने परिसरातील हे दृष्य भाविकांचे आकर्षण ठरले होते.आलेल्या सर्व भाविकांचे व योगदान देणाऱ्या तरुण मंडळातील कार्यकर्त्यांचे सोहळा कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले.
श्री कालभैरवनाथांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले बहिरवाडी क्षेत्र हे जागृत देवस्थान मानले जाते,श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा येथे येत त्यांच्या नावाने कुंड देखील येथे असून अनेक त्वचारोगाने व्याधीग्रस्त येथे येऊन स्नान करतात व व्याधी दूर होते अशी श्रद्धा अजून ही भाविकांमध्ये जोपासली जात आहे.तसेच येथील नदीपात्रातील ओली वाळू घराच्या अंगणात शिंपल्यास
विंचू व साप फिरकत नाही अशी ही श्रद्धा असल्याने भाविक प्रवरेत स्नान करून मूठभर वाळू घरी घेऊन जातात.
दिवसेंदिवस बहिरवाडी या क्षेत्राचा महिमा वाढत असून गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी लक्ष घातल्याने नव्याने सव्वा कोटी रुपये खर्चाचे बांधलेले मंदिर भाविकांचे आकर्षण ठरत आहे.पौष महिन्यात देखील पाच ही रविवारी येथे यात्रा भरते भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता श्री कालभैरवनाथांच्या या क्षेत्राला "ब"वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा
मिळावा अशी मागणी भाविकांनी केली आहे.

إرسال تعليق