रोहित पवारांचे पालकमंत्री राम शिंदेंवर जोरदार टीकास्त्र
जामखेड | प्रतिनिधी
प्रसिध्द अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या एका चित्रपटात जशी विहीर चोरीला गेली तशीच कर्जत जामखेड मतदारसंघातली हायमॅक्स, चावडी, बगीचा, रस्ते ही कामे चोरीला गेली आहेत. चार दोन लोकं मोठी होत असतील तर त्याला विकास म्हणत नाहीत तर सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारते त्याला विकास म्हणतात असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी केले.
राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी जामखेड तालुक्यातील आनंदवाडी, धामणगाव,तेलंघशी,गीतेवाडी, दरडवाडी,चव्हाणवाडी,सातेफळ,पांढरेवाडी आदी गावांचा शनिवारी गावभेट दौरा करत ग्रामस्थांशी संवाद साधला. मंत्री राम शिंदे यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात लावलेल्या विकास कामांच्या फ्लेक्सवर रोहित पवार यांनी जोरदार टिका केली.
रोहित पवार म्हणाले, ' खर्डा परिसरातील बालाघाट डोंगररांगेतील गावांमधून दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोकं स्थलांतर करतात. आता हेच चित्र बदलवण्यासाठी मी या भागात आलो आहे. मला भविष्यात एवढे काम करायचे आहे की कोणालाही ऊस तोडणीसाठी जावे लागणार नाही. तरुणांना रोजगार,महिलांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न मंत्र्यांनी कधी केला नाही.शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना ते कधी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.
गावोगावी जावून प्रत्यक्ष भेट घेऊन पवार हे तेथील ग्रामस्थांच्या, शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेत आहेत. ग्रामस्थांच्या असलेल्या मागण्या,महत्वाचे प्रश्न नमुद करून घेत आहेत.ग्रामस्थ व महिला वर्गाचीही मोठी गर्दी होत असुन उद्याच्या काळात शेती,शिक्षण,पाणी, आरोग्य आदी प्रश्न सोडवण्यासाठी पवार हेच पर्याय असल्याच्या भावना ग्रामस्थ व्यक्त करताना दिसत आहेत.
मतदारांना आकर्षित करणार ठरू लागला रोहित पवारांचा साधेपणा
राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार हे गावभेट दौरे करत असताना त्यांच्या या दौऱ्यात नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रोहित पवारांभवती जमणार्या गर्दीतले चेहरे अनेक प्रश्न,अडीअडचणी घेऊन थेट रोहित पवार यांच्याशी संवाद साधत आहेत. रोहित पवार गावभेट दौर्यात थेट जमिनीवर जनतेत बसून संवाद साधत आहेत. रोहित पवारांचा हाच साधेपणा जनतेला मोठ्या प्रमाणात भावत आहे.

Post a Comment