चांदेकसारे (वार्ताहर)
संत तुकाराम ,संत ज्ञानेश्वर संत एकनाथांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भागवत हे धर्मग्रंथ देऊन जगाला आध्यात्मिक संस्कार दिले.खरा तो एकची धर्म या प्रमाणे संत नेहमी दुसऱ्यासाठी जगले. वारकरी संप्रदायाने अठरा पगड जातीचा समाज एका छत्रछायेखाली बांधला तो केवळ संतांचे अध्यात्मिक वृत्तीमुळे परमेश्वर सर्वांगाने एक आहे त्यामुळे पूर्वी वारकरी भाविक कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता भगवंताची एकरूप होण्यासाठी स्वतःला झोकून देत होते. आताच्या भाविकाची व्याख्या बदलली असून केवळ स्वार्थासाठी सर्व चालले आहे.परंतु आजही दुसर्याच्या आनंदात आनंद मानणारा व देशाचं संरक्षण करणारा सीमारेषेवर आपलं आयुष्य समाजासाठी घालवणारा सैनिकच खरा भाविक आहे असे प्रतिपादन अक्रूर महाराज साखरे यांनी केले.
ते कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे बाल भैरवनाथ जयंती सोहळ्यात बोलत होते.
श्री राम रतन पंचायतन आश्रम ट्रस्ट व चांदेकसारे ग्रामस्थांच्यावतीने बाल भैरवनाथ यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली. यावेळी धर्मदाय आयुक्त सौ शेळके,सौ भिंगारकर,सौ साधना जाधव, सभापती अनुसयाताई होन, मनसुख महाराज दहे , श्रीराम पंचायतन आश्रम ट्रस्टचे सर्व सदस्य,आदीसह चांदेकसारे परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ट्रस्टच्यावतीने संजीवनी ब्लड बँक यांना बोलावून रक्तदान शिबीर घेण्यात आले त्यात तब्बल 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सकाळी भव्य सत्यनारायण महापूजा करण्यात आली त्यात जवळजवळ 51 जोडपे सहभागी झाले होते. पुरोहीत विनोद जोशी ,उमेश जोशी व त्यांचे सर्व सहकारी यांनी बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरीची विधिवत पूजा केली. श्री राम रतन पंचायतन आश्रम ट्रस्टच्यावतीने संपूर्ण चांदेकसारे गावातून बालभैरवनाथ व माता जोगेश्वरी ची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
डॉ. विजय होन ,दिगंबर गुरसळ, वैभव पवार व योगेश अंबिलवादे यांनी आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाची पंगत दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ राजश्री पिंगळे यांनी केले.

Post a Comment